अहमदनगर

गंगापुर येथील 'गुरुपूजन-स्नेहमिलन' समाज्यासाठी प्रेरणादायी

माजी विद्यार्थ्यांनी २५ वर्षांनंतर केले अनोखे 'गेट टू गेदर' 


गंगापुर प्रतिनिधी

येथील न्यू हायस्कूल शाळेतील इ. दहावीतील १९९८-९९ या बॅचचा स्नेहमिलन सोहळा रविवारी(२५)रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पंचवीस वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या तत्कालीन शिक्षकांची वाजत गाजत मिरवणूक काढत गुरुपूजन करून एक आदर्श घालून दिला. सामाजिक उपक्रमासह हटके केलेल्या आयोजनामुळे हे अनोखे स्नेहमिलन शहर व परिसरात चर्चेचा विषय ठरले.

शाळेच्या इयत्ता दहावीच्या १९९८-९९ सालच्या इ. १० वी बॅचच्या विद्यार्थ्यांनी मागील पंधरा दिवसापासून या स्नेहमेलनाची जोरदार तयारी चालवली होती त्यानुसार कुठल्याही हॉटेलवर किंवा लॉनवर स्नेहमीलन न घेता ज्या मातीत आपण घडलो, जिथे शिक्षणाचे धडे गिरवले, ज्या शाळेमुळे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्यास वाव मिळाला त्या मातीतच स्नेहमिलन घेण्याचा निर्धार करून समाज माध्यमांचा योग्य वापर करत आपल्या तत्कालीन तुकडी अ व ब मधील जवळपास १६५ विद्यार्थ्यांना संपर्क करण्यात आला. स्नेहमिलनाच्या अगोदर तयारीचा भाग म्हणून समाज माध्यमावर 'शाळा पुन्हा भरते आहे....' अशी अनोखी निमंत्रण पत्रिका, कार्यक्रमाची संहिता, कार्यक्रमाचे स्वरूप यासह आदी गोष्टी व्हायरल केल्याने माजी विद्यार्थ्यासह सर्वांनाच कार्यक्रमाची उत्सुकता लागून होती. त्यानुसार नवीन न्यू हायस्कूल शाळेच्या प्रांगणात रविवारी (२५) रोजी २५ वर्षानंतर या गुरुपूजन व स्नेह मिलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी सर्वांचे लक्ष वेधून घेणारा विचारमंच, भव्य शामियान्यासह वातानुकूलित व्यवस्था, गोलाकार टेबल, बाटलीबंद पाणी, चॉकलेट अशी 'पंचतारांकित' व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या आधी चहा नाश्ता व नाव नोंदणी करून सर्वांना फेटे परिधान करण्यात आले. दहाच्या ठोक्याला शाळेची घंटा झाली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सवित्रिमाईंच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेचे तत्कालीन दिवंगत शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या बॅनर वरील छायाचित्रास आदरांजली वाहण्यात आली. यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शिक्षकांचे माजी विद्यार्थ्यांनी स्मृतिचिन्ह, ग्रंथ, पेन व भेटवस्तू देऊन सामूहिक गुरुपूजन केले. तसेच जुनी न्यू हायस्कूल शाळा येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी चौक मार्गे नूतन शाळेपर्यंत डोलीबाजासह फटाक्यांच्या आतिषबाजीत गुरुजनांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. यानंतर नूतन शाळेच्या प्रांगणात शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करून माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला ग्रंथ व विविध भेटवस्तू देण्यात आल्या. दुपारच्या मध्यांतरात विविध मेनुंचे स्वादिष्ट भोजन त्यांनतर आईस्क्रीम व पान देण्यात आले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत आणली संगीत खुर्ची, एकपात्री प्रयोग, नृत्य संगीत व गीत, अभंग देशभक्ती पर गीतांच्या सादरीकरणाच्या मेजवानिसह विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी भेटलेल्या वर्ग मित्रांनी शालेय आठवणींना उजाळा देत एकमेकांची आस्थेंने  विचारपूस केली. या बॅचचे अनेक विद्यार्थी आज राज्यासह परराज्यातही विविध मोठ्या पदावर कार्यरत असून या शाळेतील शिक्षकांमुळेच आपण घडलो अशा भावना व्यक्त केल्या याप्रसंगी शाळेच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले होते.

भविष्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प यानिमित्ताने करून दर चार वर्षानी स्नेहमिलन करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. गुरुपूजनासाठी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आशीर्वाद देताना आकाशात उंच भरारी जरूर घ्या, परंतु त्याचा कधीही अहंकार होऊ देऊ नका. आपले पाय तितकेच जमिनीत मजबूत ठेवून समाज भान ठेवा, आरोग्याची काळजी घेत कुटुंबाला एकसंध राहू द्या,आई-वडील व सासू-सासर्‍यांना जपा आणि सदैव्य सामाजिक जबादारी व माणूसपणाची शिकवण विसरू नका हा मोलाचा संदेश दिला. यावेळी न्यू हायस्कुल शालेय समितीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे,मुख्याध्यापक रवींद्र कवडे, पुंडलिक नवले, मच्छिंद्र कराळे, आप्पासाहेब फलके, रवींद्र ठाणगे, पोपट खाडे, मनसुख तांबे, प्रकाश जाधव, रूपचंद बाराहाते, अनिता गोरे, विजया पाटील, रामकिसन काटकर हे गुरुजन हजर होते. पंचवीस वर्षानंतर एकत्र आलेल्या शाळेच्या तत्कालीन १३४ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी 'गूरुपुजन स्नेहमिलाना' च्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


'मी तृतीयपंथी असूनही मला कोणतीही वेगळी वागणूक न देता तसेच माझ्यासोबत कोणताही भेदभाव न करता माझ्या सर्व वर्ग मित्र-मैत्रिणींनी मला कार्यक्रमात सामावून घेत मानाचे स्थान दिले, आपल्या बरोबरीने बसविले ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. असे मित्र सर्वांनाच मिळत नाही हे मित्र म्हणजे माझा सर्वात मोठा आधार व माझी संपत्ती आहे' असे भावनिक उदगार या बॅचच्या एका तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी काढताच सहकारी मित्रांनी त्याला आलिंगन दिले यावेळी स्नेहमिलनाचे वातावरण अतिशय भावनिक झाले होते.

शाळेच्या प्रांगणात झालेल्या या अनोख्या स्नेहमिल व गुरूपूजन कार्यक्रमाची गंगापूर शहर व परिसरात जोरदार चर्चा होती असे स्नेहमिलन व असे कार्यक्रम ही काळाची गरज असल्याची भावना अनेकांनी या निमित्ताने व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या