अहिल्यानगर
विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका बलभीमराव जगताप (वय ६७) यांचे आज पहाटे निधन झाले. पाच एप्रिल रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते.
अरुणकाका जगताप यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ते सलग पाच वर्षे अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष राहिले. दोन वेळा विधान परिषदेवर निवडून आले. अहमदनगर शहर मतदारसंघातून दोन वेळा पराभूत झाले. महापालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले, मात्र स्वतःऐवजी त्यांनी आपल्या चिरंजीव संग्राम जगताप यांना महापौर केले. जिल्हा बँकेचे संचालक, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले. त्यांना घोडेस्वारी, नव्या गाड्यांचा छंद होता, तसेच शेती, उद्योग आणि हॉटेल व्यवसायात विशेष रुची होती.
त्यांच्या अंत्यसंस्कार आज सायंकाळी चार वाजता अहिल्यानगर येथील अमरधाम स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव भवानीनगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
0 टिप्पण्या