बारामती
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून यंदा राज्यात दिवाळी साजरी करण्यात येणार नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी जाहीर केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने आवश्यक ती मदत केली नाही, अशी खंतही पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
बारामतीतील गोविंद बाग येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, "प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी संघटनेतील सहकाऱ्यांशी चर्चा करून पक्षाकडून यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अस्वस्थ आहेत आणि ते दिवाळी साजरी करण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे पक्षाने दिवाळी न साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे."
"राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आवश्यक असलेली मदत पुरवण्यात आलेली नाही. या प्रकरणात राजकारण आणले जात आहे. आम्हाला यात राजकारण करायचे नाही. मात्र, ज्यांच्या हातात राज्याची सत्ता आहे, त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. राज्य सरकारने केलेली मदत कमी आहे. त्यातून कोणतेही नुकसान भरून निघू शकत नाही," अशी टीकाही पवार यांनी केली.
0 टिप्पण्या