मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी एका चोराने चक्क तलावाचा आसरा घेतला आणि तब्बल ५ तास पाण्यात लपून राहिला. रीवा-इतवारी एक्सप्रेसच्या एसी डब्यात एका महिलेची पर्स चोरताना आरपीएफ जवानांनी ४२ वर्षीय हरविंदर सिंह उर्फ सनीला पाहिले. जवानांनी पाठलाग सुरू करताच त्याने जवळच्याच एका शेवाळलेल्या तलावात उडी घेतली. विशेष म्हणजे, पाण्यात श्वास घेण्यासाठी त्याने कमळाच्या पोकळ देठाचा वापर केला, ज्यामुळे तो बराच वेळ पाण्याखाली राहू शकला. अखेर स्थानिक पोलीस आणि गोताखोरांच्या मदतीने पाच तासांच्या प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढण्यात आले. बाहेर आल्यावरही त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र जवानांनी त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनौरचा असून २०१७ मध्ये तो तिथला नगरसेवकही राहिला आहे. त्याच्यावर विविध राज्यांत २१ हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

0 टिप्पण्या